प्रतिभेतून यशप्राप्ती हीच देशभक्ती : धर्माधिकारी   

पुणे : मानवी संस्कृतीच्या विकासासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा आविष्कार असणे आवश्यक आहे. स्वत:ला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात मूलभूत अभ्यास व प्रतिभेची वाटचाल करत यश प्राप्त करणे हीच आजच्या खर्‍या देशभक्तीची व्याख्या आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडल परिवार संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले. 
 
संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधनाच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट या संस्थेचा ३० वा वर्षपूर्ती आनंदोत्सव आणि उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभ रविवारी (ता.२५) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उत्तुंग परिवार ट्रस्टच्या विश्वस्त विदुषी आशा खाडिलकर, सहविश्वस्त ओंकार खाडिलकर मंचावर उपस्थित होते. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांना स्व. विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवनसाफल्य सन्मान, ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचे संस्थापक विद्याधर निमकर यांना उत्तुंग गुणगौरव सन्मान, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांना उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान आणि मराठी रंगभूमी तसेच ललित कलांच्या प्रसारासाठी कार्य केलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे या संस्थेला उत्तुंग आदर्श संस्था सन्मान देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश (२५ हजार रूपये) असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
 
कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. उत्तुंग परिवार ट्रस्टच्या विश्वस्त विदुषी आशा खाडिलकर, सह विश्वस्त ओंकार खाडिलकर मंचावर होते.
 
धर्माधिकारी म्हणाले, मूळ भारतीय संस्कृतीत असणारी उदारता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता आज कमी झाल्याचे दिसून येत आहे. माणसांच्या नात्यांमधील ताण-तणाव वाढताना जाणवत आहे. यातूनच युवा पिढीत व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा वेळी पुरस्कारप्राप्त असामान्य प्रतिभावान व्यक्तींचे कार्य समाजासाठी आदर्शवत ठरत आहे. 
 
पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, चार वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्मानमूर्ती एकाच मंचावर आहेत. याचे श्रेय माधवराव व आशाताई खाडिलकर यांनी स्थापन केलेल्या उत्तुंग संस्थेचे आहे. वेदश्री खाडिलकर-ओक आणि मानसी दीक्षित यांनी उत्तुंग गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. 
 

Related Articles